अहिल्यानगर जागतिक पातळीवर पर्यावरण विषयक परिषदा होतात. पण त्यामुळे सामान्य माणसांच्या आयुष्यात तातडीनं बदल घडत नाही. मात्र, ग्रामीण भागात झालेल्या परिषदेमुळे आपल्या परिसरात बदल हा झपाट्याने होईल. त्यातून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला गती मिळेल. त्यामुळे अशा पर्यावरण विषयक परिषदांचे गावोगावी आयोजन व्हावे, असे मत जागतिक कीर्तीच्या पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी व्यक्त केले.
पर्यावरण दिनानिमित्त आत्मनिर्धार फाऊंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आयोजित इसळक येथे ग्रामीण भागातील पहिल्या पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. आत्मनिर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी काळात काय करणार आहोत याचा उपस्थितांसमोर उहापोह केला. आपल्या परिसरातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांचे संघटन करून कृती कार्यक्रम हाती घेण्यासाठी आजची परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वॉटरमॅन रमेश खरमाळे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी सचिन कंद, प्रा.डॉ. मेहबूब सय्यद यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ प्रबोधनकार हभप भगवान घुगे शास्त्री यांनी भूषविले.
यावेळी बोलताना डॉ. कर्वे पुढे म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धन म्हणजे निव्वळ वृक्ष लागवड नसून गवताच्या पात्यापासून ते झाडांपर्यंत सर्वांचंच संवर्धन म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन होय. पर्यावरण संवर्धनासाठी डॉ. कर्वे यांनी परिषदे दरम्यान काही उपायोजना सुचवल्या. शालेय स्तरावर हवामान नोंदी ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास प्रत्येक भागात स्वतःचे असे वेदर स्टेशनस् उभे राहतील.
गावाबाहेरून गावात येणाऱ्या छोट्या वस्तूंची निर्मिती सुरू केल्यास पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक कमी होण्यास मदत होईल. कारखान्यामधून येणारं सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडलं जातय की नाही हे पाहणे, ही लोकांची जबाबदारी आहे.लोकप्रतिनिधी हे जनतेचे नेते नसून जनतेचे अनुयायी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर पर्यावरणप्रेमींचा दबावगट निर्माण करण्याचे काम या परिषदांमधून होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
वॉटरमॅन रमेश खरमाळे यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम विविध उदाहरणांच्या माध्यमातून विशद केले. कार्बन डायऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढत असून पर्यावरण संवर्धनासाठी तातडीनं उपाययोजना कराव्या लागणार असल्याबाबत गांभीर्यपूर्वक मांडणी केली. अन्यथा मानव जातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला. पावसाळ्याच्या पूर्वीच जमिनीत काही क्षेत्रात चर खोदून पाणी जमिनीत जिरवल्यास भूजल पातळी वाढून पठार भागावर नंदनवन फुलेल, असेही ते म्हणाले. विभागीय वनाधिकारी सचिन कंद यांचेही यावेळी भाषण झाले.
या परिषदेला पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आपल्या परिसरातील पर्यावरणपूरक कार्यक्रम हाती घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात संदीप महाराज कळसे, अमित गायकवाड, रामदास कोतकर, सागर दाणी, बलभीम निमसे, संतोष घोलप, सतीश गेरंगे, राज ठोंबरे, संजय म्हस्के, प्रिया कोठारी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पर्यावरणप्रेमींनी विविध सूचना मांडल्या. या सूचनांची नोंद घेऊन आगामी काळात चिंतन बैठकीचे आयोजन करून कृतिकार्यक्रमाची घोषणा केली जाईल, अशी माहिती समन्वयक ॲड. राहुल ठाणगे यांनी दिली.
परिषदेचे सूत्रसंवादक म्हणून सुनिल जाजगे, दादासाहेब घोलप यांनी काम पाहिले. पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी आभार मानले.
यावेळी त्रिदल संघटनेचे एकनाथ आडसुरे, लेखक सचिन मोहन चोभे, ह.भ.प. सिद्धनाथ मेटे, संगिता जाजगे, संध्या मेढे, सतीश सातपुते, अंकुश शेळके, बाळासाहेब खपके, उद्योजक अजय लामखडे, डॉ.दिलीप पवार, संजय गेरंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप गेरंगे, संभाजी सोनवणे, मच्छिंद्र म्हस्के, ज्ञानेश्वर डहाळे, रविंद्र पवार यांनी मेहनत घेतली .