संगमनेर- काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याने शेतकरी ऊस उत्पादक व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना उच्चांकी भाव दिला आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रम अंतर्गत नव्याने एआय वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करणार असून यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात घुले यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावर शेती आरोग्य व शिक्षण या क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती अॅग्रीकल्चर ट्रस्टने याचा वापर केला असून जमिनीच्या पोतानुसार आवश्यक खते, उसावर आलेले बुरशी, कीटकनाशके यांचा करावयाचा वापर याबाबतची माहिती तात्काळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळेल.

त्याचबरोबर उसाच्या फुटव्यांची संख्या, त्यांची वाढ समान ठेवण्यात यश मिळेल. या पद्धतीमुळे अंदाजे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होऊन पाण्याची ३० टक्के बचत होते. खते, रोग व कीड नियंत्रण औषधांच्या खर्चामध्ये ४० ते ५० टक्के बचत होते, असे प्रायोगिक तत्वावर सिद्ध झाली आहे.
थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी २५ शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात येणार आहे. गटनिहाय ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग असणार आहे. याचबरोबर ही प्रणाली पूर्व हंगाम व सुरु हंगामाकरीता राहणार असून शेतकरी हा ऊस नियमित पिकवणारा, अँड्रॉइड मोबाईल वापरणारा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणारा असावा. त्याचप्रमाणे भरपूर पाणी जरी असले तरी ठिबक सिंचनचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती व ऊस विभागाशी संपर्क करावा किंवा गट ऑफिसमध्ये आपली नाव नोंदणी २० जुलै २०२५ पर्यंत करावी, असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.