कोपरगाव- अर्धा जुलै महिन्यातच जायकवाडी धरण ६५ टक्के भरले आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून येणाऱ्या काळात ओव्हरफ्लोच्या पाण्यातून गोदावरी कालवे जास्तीत जास्त दिवस कसे चालतील, यासाठी कर्तव्यात कसूर न करता प्रामाणिक नियोजन करावे, अशा थेट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.
याबाबत आमदार काळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यावर जायकवाडीच्या पाण्याची कायम टांगती तलवार राहिलेली आहे. परंतु यावर्षी निसर्गाने अर्धा जुलै महिन्यातच जायकवाडी धरण ६५ टक्के भरले. २०२० नंतर पुन्हा एकदा धरण भरले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी निसर्गाने भरभरून दिले आहे. आता आमच्या ताटात माती कालवू नका. एवढीच अहिल्यानगर व नाशिककरांची अपेक्षा आहे.

सध्या मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आ. आशुतोष काळे या अधिवेशनासाठी उपस्थित असले तरी मे व जून महिन्यापासून आजतागायत धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडत असलेला पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात जमा होणाऱ्या पाणी साठ्याच्या आकडेवारीवर त्यांचे बारीक लक्ष होते.
धरण क्षेत्रात पर्जन्यवृष्टी तर गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, याबाबत जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांनी पत्र देखील दिले आहे.
सद्य स्थितीत ३२.६९० क्युसेक्सने नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु असून काल बुधवारी रात्री बारापर्यंत जायकवाडी धरण निश्चितपणे ६५ टक्के भरले जाणार आहे. त्यामुळे यापुढे ओव्हरफ्लोचे पाणी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत न सोडता ते पाणी पावसाळा सुरु, असे पर्यंत गोदावरी कालव्यांना सोडावे.
तसेच पालखेड डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावतळे, साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावीत. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील खोलवर गेलेली भूजलपातळी वाढली जावून शेतकऱ्यांच्या चिंता मिटणार आहे.