Mp Nilesh Lanke : कुसुमाग्रजांचा ‘कणा’आणि खासदार निलेश लंके यांचा पूरग्रस्तांसाठी लढा

Published on -

Mp Nilesh Lanke : कुसुमाग्रजांची एक अजरामर कविता आहे. ‘कणा’ असं या कवितेचं नाव. या कवितेची आठवण व्हायचं कारण म्हणजे राज्यभरात गेल्या आठवड्याभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. निसर्गाच्या या रौद्र रुपामुळे अनेक गावांमधील ओढे-नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही गावांना तर याचा जास्त तडाखा बसला. गावांमध्ये गाळ साठला, रस्ते ब्लॉक झाले. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. जिल्ह्यातील वाळकी, खडकी, अकोळनेर, जाधववाडी, सोनेवाडी, सारोळा कासार,अस्तगाव आणि भोरवाडी ही गावे आणि परिसरातील अनेक कुटुंबे या अतिवृष्टीमुळे बाधित झाली. शेती-मातीचं मोठं नुकसान झालं. अनेकांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं.

या कठिण काळात शासनाच्या व्यवस्थेच्याही अगोदर ‘मावळा’ संघटना ठामपणे अतिवृष्टी बाधितांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांना मायेचा आधार दिला, आपुलकीने मदत केली. यामुळे राज्यभरात या ‘मावळा’ संघटनेची सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे. ही संघटना अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन ही संघटना काम करते. या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांची साफसफाई केली जाते. इतिहासाचे पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून संवर्धन केले. यापुर्वी शिवरायांचे जन्मस्थळ असणारा किल्ले शिवनेरीसह, बहादूरगड, रायरेश्वर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. त्यानंतर अतिवृष्टीच्या नंतर झालेल्या मदत आणि बचावकार्यात खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा संघटनेने नेत्रदीपक काम केले.

निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली यापुर्वी कोरोना काळात महत्त्वपूर्ण काम झाले. या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. निलेश लंके खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून पुढे आले. त्यानंतर आता मावळा संघटनेच्या माध्यमातून ते अडचणीत सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी धावले. अतिवृष्टी झाल्याची वर्दी मिळताच लंके यांनी पिडीत गावांचा तातडीने दौरा केला. या गावांतील नुकसानाची आढावा घेतला. शासकीय मदतीची अजिबात वाट न पाहता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चिखल-गाळ उपसायला सुरुवात केली. स्वतः खासदार आपल्या गावातील चिखल उपसत आहेत हे पाहताच गावकऱ्यांनीही श्रमदानात सहभागी होऊन परिसर पुन्हा पहिल्यासारखा केला.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी साफसफाई आणि श्रमदानाची मोहिम राबविण्याचे ठरविले. यानुसार रविवारी १ जून रोजी पशुवैद्यकीय डॉक्टर आपल्या दारी, शालेय साहित्य वाटप, चारा वाटप आदी उपक्रम देखील घेतले गेले. महत्वाचे म्हणजे या भागात आपला जीव धोक्यात घालून मदत व बचावकार्य करणाऱ्या नागरीकांचा खडकी ग्रामपंचायतीसमोर जाहिर सत्कार करण्यात आला.

जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे तथाकथित नेते आणि नेत्यांचे राजपुत्र आपल्या हस्तीदंती मनोऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत त्यावेळी खासदार निलेश लंके आपल्या सहकाऱ्यांसह पूरग्रस्त भागात चिखळ-गाळ उपसत आहेत, ही जनतेचा आपला माणूस कोण हे सिद्ध करणारी गोष्ट आहे. त्यांना जनता त्यांना लोकनेता म्हणते ते यासाठीच… जनतेच्या सुखा-दुःखात समरस झालेला असा नेता विरळाच..!

कवितेत शेवटी पूरग्रस्त म्हणतो की, जरा एकटेपणा वाटला म्हणून तुम्हाला माझी व्यथा सांगतोय. पुरामुळे संसार मोडून पडला तरी कणा मोडलेला नाही. तुम्ही फक्त पाठिवर हात ठेवून लढ म्हणा, मी पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहीन. कवितेत दाखविलेली सर्वसामान्य माणसाची झुंजार वृत्ती खासदार निलेश लंके पुरती जाणून आहेत. कारण अगदी कालपरवापर्यंत ते रिटायर्ड शिक्षकाचा मुलगा म्हणूनच वावरत होते. सर्वसामान्य माणसाची दुःखं, अडीअडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत, सोसल्या आहेत. म्हणूनच अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देताना स्वतः पँट गुडघ्यापर्यंत खोचून खोऱ्याने चिखल-गाळ उपसणारे खासदार निलेश लंके पाहताना आश्चर्य वाटत नाही. उलट त्यांच्याप्रतीची आपुलकी आणखी घट्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe