संगमनेर- तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल बुधवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेद खान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत, सुभाष दिघे, संजय कानवडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर हे दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यपरायणता भविष्यात संगमनेर शहरातील नागरिकांना कायम देशसेवेसाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी असणार आहे. त्यासाठी त्यांचे स्मारक संगमनेरात होणे गरजेचे आहे. तसेच येथील अकोला नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
संगमनेरचे सुपुत्र मेजर संदीप घोडेकर हे देशसेवा बजावत असताना त्यांना मृत्यू आला. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी दिलेले देशाकरीता बलिदान हे संगमनेरकरांच्या कायम स्मरणात राहील, अशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
संगमनेर शहरातील घोडेकर परिवारातील मेजर संदीप घोडेकर यांनी कायम देशसेवेला प्राधान्य दिले. देशी सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या वीर जवानाने अखेरचा श्वासही सेवेत घेतला. इतक्या लवकर जाणे दुर्दैवी असल्याची भावना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.