Ahilyanagar News: संगमनेर-तालुक्यातील पठारभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी येथे धरण व्हावे, अशी साकुर पठारभागातील जनतेची अनेक वर्षाची मागणी होती. या मागणीचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली असून १८ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयामध्ये मंत्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरवाडी धरणाच्या संदर्भात जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी दिली.
साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार
वरवंडी येथील दत्त मंदिरात येथील युवक कार्यकर्ते दत्तात्रेय वर्षे, राज पाटोळे आणि समस्त वरवंडी ग्रामस्थांच्या वतीने आ. खताळ यांची नुकतीच पेढेतुला करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ते पुढे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी मुळा नदीवर मोरवाडी धरण व्हावे, अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. हे धरण होण्यासाठी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर हे ठिकाण मागे पडून याच नदीवर पुढे राहुरी तालुक्यातील मुळा धरण बांधण्यात आले.
पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण होणार
सध्या मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. त्यापैकी पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये साकूर पठारभागातील गाांचा समावेश नसल्याने ही गावे अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहिली आहेत. तसेच या धरणाच्या लाभ क्षेत्रात या पठार भागाचा समावेश व्हावा, यासाठी अकोले तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. त्यामुळे पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण व्हावे, अशी या भागातील नागरीकांची इच्छा आहे.
अनेकांची उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख खांबाचे सरपंच रवींद्र दातीर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, माजी सरपंच बाबाजी सागर, अॅड. अमित धुळगंड, भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, आरपीआय तालुकाध्यक्ष आशिष शेळके, ऋषीराज बाबा परांडेकर, विद्याताई महाराज बानकर, पुरुषोत्तम महाराज पेटकर, गणेश डोंगरे, भागवत बस्ते, डॉ. संतोष वर्षे, बाजीराव पाटोळे, राजाबापू वर्षे, उल्हास गागरे, एकनाथ वर्षे, संपत भोसले, तुळशीराम पाटोळे, सुभाष पाटोळे आदी उपस्थित होते.
सभा मंडपासाठी दहा लाखांचा निधी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथे दत्त महाराजांच्या मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी तुम्ही प्रस्ताव द्या, हे मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घेण्यासाठी आपण शासन पातळीवर प्रयत्न करू. तुम्ही माझ्याकडे सभामंडपाची मागणी केली आहे. त्यामुळे आमदार निधीतून सभा मंडपासाठी दहा लाख रुपये जाहीर करीत असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.