राहाता- नाथसागर धरणाच्या जलपूजनानिमित्त जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावनिक आणि ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत विकासाचे अनेक पैलू उलगडले. धरणाच्या निर्मितीपासून ते भविष्यातील नदीजोड प्रकल्पापर्यंतच्या या प्रवासात त्यांनी निसर्ग, इतिहास, विस्थापन आणि शासनाच्या दूरदृष्टीचा समतोल साधत विकासाचे वचन दिले व जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंददायी क्षण अनुभवला.
अनेक वर्षांनंतर नाथसागर भरल्याचा आनंद व्यक्त करत मंत्री विखे यांनी जलपूजन करून औपचारिक सायरन वाजवून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी खणा-नारळाने ओटी भरत गोदामातेची आरती केली. यावर्षी जुलै महिन्यातच नाथसागर भरल्यामुळे लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले, मराठवाड्याला जितका फायदा झाला, तितकाच लाभ अहिल्यानगर जिल्ह्यालाही झाला आहे. या धरणाच्या पाण्यावरून पूर्वी वादही झाले होते, मात्र निसर्गच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे, असे सांगून त्यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
या धरणामुळे आपल्या बहिणीला विस्थापित व्हावे लागल्याची आठवण सांगताना ते भावुक झाले. धुळे येथे शिक्षण घेत असताना सायकलवरून नाथसागर पाहायला कसे आले आणि परतीच्या प्रवासात सायकल बसवर टाकून कशा नेल्या, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पाण्याचे संघर्ष संपवण्यासाठी महायुती सरकारने मोठा आराखडा तयार केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि डॉ. गणपतराव देशमुख यांनी मांडलेल्या नदीजोड संकल्पनेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे प्रकल्पाची वाटचाल गतीने सुरू आहे.
आ. विलास बापू भुमरे यांनी नाथसागराचे जलपूजन करणारे पहिले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठरल्याचे सांगितले. हिकमत कार्यक्रमास आ. उढाण, आ. विजयसिंह पंडीत, आ. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अरुण नाईक, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, सभापती राजू भुमरे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादापाटील बाहे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेच्या मागण्यांची जागेवरच दखल कार्यक्रम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने घोषणाबाजी केली. त्याची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे प्रतिनिधी बोलावून घेतले आणि सभेच्या ठिकाणीच चर्चा करून जिल्हाधिकारी स्वामी यांना आवश्यक सूचना दिल्या.