छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन एका ठिकाणी झाले असतांना पुतळा दुसऱ्या ठिकाणी बसवायचा घाट का? आमदार हेमंत ओगले यांचा सभागृहात सवाल

Published on -

श्रीरामपूर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेहरू भाजी मंडई येथे स्थापित का करण्यात आला, असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान काल बुधवारी उपस्थित केला.

यावेळी आमदार ओगले म्हणाले की, सर्व श्रीरामपूर वासियांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा, त्या अनुषंगाने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक मान्यवरांच्या हस्ते ठिकाणी सदर भूमिपूजन देखील करण्यात आले.

परंतु अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जागा बदलून नेहरु भाजी मंडईमध्ये महाराजांचा पुतळा घाईघाईत बसविण्यात आला. या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन देखील केलेत. तसेच महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा, याकरिता मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जवळपास ५५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा, यासाठी सह्या केल्या आहे.

माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळे तयार झाले होते. जर नेहरू भाजी मंडई समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा असता तर गेल्या १० वर्षांपूर्वीच सदर स्मारक त्या ठिकाणी तयार झाले असते.

परंतु समस्त श्रीरामपूरवायीयांची इच्छा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच स्थापित व्हावा. महापुरुषांचे पुतळे, स्मारके यामध्ये कोणतेही राजकारण न करता नागरिकांची अस्मिता लक्षात घेऊन पहिल्या दिवसांपासून आपण या विषयात आवाज उठवत आहोत, असे देखील आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील तयार असून फक्त वनविभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी सदरचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून याबाबत संबंधितांना आदेश देऊन वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी देखील मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!