Ahmednagar News : पैठण-पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी कासार- लोहा या राष्ट्रीय महमार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा ३५ कोटी रुपये मावेजा केंद्र सरकारने मंजूर केला असल्याचे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
पैठण-पंढरपूर या पालखी मार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या भूसंपादनाचे २०.७२ कोटी आणि खरवंडी कासार – लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील चार गावांच्या संपादित जमिनीसाठी १४.१८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भू संपादनाच्या मावेजा संदर्भात सातत्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडे पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारने या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मंजूर केला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच हा मावेजा मंजूर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मावेजा लवकरच जमा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले असून शेतकऱ्यांना देखील धन्यवाद दिले आहेत. लवकरच या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
दरम्यान, पाच वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यातील पाच गावाची जमीन संपादन केली मात्र या जमिनीच्या मावेजाबाबत सातत्याने शेतकऱ्यांना शासनाकडे चकरा माराव्या लागल्या. याप्रकरणी खा. विखे पाटील यांच्याकडे या शेतकऱ्यांनी आपली तक्रार सांगितल्यावर
सुजय विखे यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा मावेजा मंजूर करून दिला. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या न्यायाबद्दल दादांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले असल्याचे भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी सांगितले.