Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (२१ जानेवारी) अहमदनगरमध्ये आली. या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता.
कौतुकास्पद म्हणजे मराठा समाजच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लीम समाजाने मदरशाच्या ८५ एकर जागा दिली होती. सामाजिक एकतेचा अनोखा संदेश याद्वारे समाजात पोहोचला आहे.
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2024-01-22T105540.955.jpg)
बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती. त्यापैकी ८५ एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही सेवा दिली.
याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता.
महिलांची मदरशामध्येच उत्तम व्यवस्था
बाराबाभळी येथील मदरशातच मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्रीचा मुक्काम केला. पदयात्रेत महिलाही सहभागी आहेत. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती.
रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सेवा दिली.
मनोज जरांगे पाटलांना कुराणची प्रत भेट
मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज बांधवांची अत्यंत व्यवस्थित अशी सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. एकतेचा, सामाजिक एकोप्याचा संदेश यावेळी संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली.