Ahmednagar News : जलजीवन मिशन अभियानांतर्गत अनेक घोटाळे झाल्याचे आरोप आ. नीलेश लंके यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यात विविध पाणीयोजना राबविण्यात आल्या. परंतु यात निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी
संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आ. लंके यांनी नागपूर विधानसभेत केला. जलजीवनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी मागणी आ.लंके यांनी केली.

काय आहेत आ. लंके यांचे आरोप
आ. लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करण्यात आला. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्या नंतर कामपूर्ण नसणे आदी प्रकार समोर आले असून यातील काहींना तर कॅपॅसिटीपेक्षा ६ कोटींची जास्त कामे देण्यात आली आहेत.
एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आल्याचा प्रतापही घडला आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे असले गरप्रकार झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.
या गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमूद केले.
‘पारनेर’मधील सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनेतही फसवणूक
जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ‘त्या’ एका संस्थेने खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम दिले गेले.
या ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दाखलेही खोटे दिले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नसून सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे आ. लंके यांनी यावेळी म्हटले.
ठेकेदारांवर कारवाई करा
टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही चौकशी करण्यात येत नाही.
वारंवार मागूनही ठेकेदारासबंधी माहिती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली असल्याने ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आ. लंके यांनी केली आहे.