अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या 497 व्यक्तींचा शोध घेतला.
यामध्ये 69 मुला-मुलींचा तसेच 428 महिला-पुरूषांचा समावेश आहे. शोध घेण्यात आलेल्या व्यक्तींना कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांसह महिला-पुरूषांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कुटूंबाच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावंर, देवस्थान ठिकाणी भीक मागणारी मुले,
पालकांशी वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेली मुले, अपहरण झालेल्या मुले तसेच हरवलेल्या महिला-पुरूषांचा शोध घेतला जातो.
गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात हरवलेली व अपहरण झालेली 69 मुले सापडली. त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.