गोरक्षक व गोसेवकांसाठी अत्यंत आनंदाची अन महत्वाची बातमी हाती आली आहे. आता यापुढे गो-तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. गोतस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आ. संग्राम जगताप हे आग्रही होते.
त्यांनीच ही मागणी केली होती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत कारवाईला विधानसभेत मंजुरी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता गोतस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आ. जगतापांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान सध्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली.
आ. जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये तातडीने टेक्निकल स्टाफची भरतीकरून अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करण्याची मागणी केली. शासनाने अहिल्यानगरच्या प्रलंबित समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे म हानगरपालिका ते महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यासाठी शासनाने नवीन नियम करावा. त्यामुळे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची हुकुमशाही न चालता जनतेचा हुकुम चालला पाहिजे, अशीही मागणी आ. जगताप यांनी यावेळी केली.यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर आता शहर चहूबाजूंनी झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे चांगल्या सुविधांसाठी व नव्या कामांसाठी महानगरपालिकेत टेक्नीकल स्टाफ असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भरतीस परवानगी द्यावी. अहिल्यानगर महानगरपालिकेत आता बोटावर मोजण्या इतके अभियंते कार्यरत आहेत.
इलेक्ट्रिक विभागाचे तर २०१८ पासून अभियंतापद रिक्त आहे. त्यामुळे तातडीने नव्या टेक्निकल स्टाफच्या भरतीस शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे. आ. जगतापांनी या अधिवेशनात विविध मुद्दे मांडून अधिवेशन चांगलेच गाजवले.