अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६१) वर मोठा बदल होत असून, हा महामार्ग डांबरीकरणाऐवजी आता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील अहिल्यानगर ते टाकळी ढोकेश्वर-पारनेर तालुका हद्द या ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. १५५ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये सिमेंट काँक्रीटने तयार केला जाणार आहे, ज्यासाठी केंद्र सरकारने २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
प्रवास अधिक सुखकर
सध्या या महामार्गावर १० मीटरचा दुपदरी डांबरी रस्ता आहे, जो आता सिमेंट काँक्रीटने पुनर्रचित केला जाईल. यामुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि गुळगुळीत होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी हा बदल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण रस्त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा मोठ्या प्रमाणावर सुधारेल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या रस्त्याच्या निर्मितीसाठी पुण्याच्या ‘टी अँड टी’ कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे. हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारला जात आहे. २०० मिमी जाडीसह ‘पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीट’ (PQC) तंत्रज्ञान वापरले जात आहे, जे टिकाऊपणा आणि वाहतुकीची गती सुधारण्यास मदत करेल.
वाहतुकीसाठी बदल
ढवळपुरी फाट्यापासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एका बाजूने पाच मीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता आधी बांधला जात आहे. सध्याच्या डांबरीकरणावरच पीक्युसी क्रॉंक्रिटचा थर टाकला जाणार आहे, त्यामुळे नवीन जमीन अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही.
महामार्गाच्या तीन टप्प्यांची संपूर्ण योजना
१. पहिला टप्पा: माळशेज ते मढ (५० किमी)
२. दुसरा टप्पा: अहिल्यानगर बायपास ते टाकळी ढोकेश्वर मार्गे पारनेर तालुका हद्द (५० किमी)
३. तिसरा टप्पा: अहिल्यानगर ते खरवंडी मार्गे पाथर्डी (५५ किमी)
टोलवाढ नाही
या संपूर्ण कामासाठी महामार्गावर कोणतीही टोलवाढ केली जाणार नाही, अशी माहिती संबंधित कंपनीने दिली आहे. रस्त्याच्या दर्जात होणाऱ्या सुधारामुळे कल्याण, अहमदनगर आणि पाथर्डी या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
नवीन महामार्गामुळे नागरिकांना काय फायदा ?
महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहती आणि ग्रामीण भागाला या नवीन सिमेंट महामार्गाचा मोठा फायदा होईल.
कल्याण आणि त्यापलीकडील भागात जाण्यासाठी आता वेगवान आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्याच्या डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंट काँक्रीटचा महामार्ग अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.
तीन टप्प्यांमध्ये सुमारे १५५ किलोमीटरचा हा महामार्ग तयार होईल, जो केंद्र सरकारच्या २५० कोटींच्या निधीतून उभारला जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा दर्जा सुधारेल आणि वाहनधारकांचा प्रवास जलद व आरामदायी होईल