मागील काही दिवसांपासून वक्फ बोर्ड अन वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणी राज्यभरात चर्चेच्या विषय ठरत आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधील अनेक ठिकाणच्या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच संगमेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची माहिती समजली आहे.

त्याचे झाले असे की, आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत ही सगळी माहिती मांडली आहे. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोड वरील सर्वे नंबर १४९ (जुना सर्वे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर,
तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व,१७९ येथील कानिफनाथ व सुकेवाडी येथील सर्व्ह नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान व पारेगाव येथील श्रीअश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमीनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून शासनाने या जमिनीबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या जमीनी परत त्या देवस्थानच्या नावावर करण्यात यावी.
तसेच हिंदूं धर्मियांच्या देवस्थानांवर होत असणारे हल्ले थांबले पाहिजे अशी लक्षवेधी आ. अमोल खताळ यांनी विधान सभेमध्ये मांडत या महत्त्वाच्या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या काही गोष्टी समोर आल्या आहेत.
गोहत्येकडेही वेधले लक्ष
संगमनेर शहरात अनेक वर्षापासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्याच्या चालक व मालकावर वारंवार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात, मात्र प्रत्येकवेळी गोवंश कत्तल करणारा माणूस तोच असतो. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगळा माणूस उभा केला जातो.
मुख्य आरोपीवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्याच्या विरोधात आंदोलन करूनही ही बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नाही,
त्यामुळे शासनाने अनधिकृत कत्तलखान्यांवरती योग्य ती कारवाई करून गोवंश हत्या बंदी करावी अशी लक्षवेधी करत आ. अमोल खताळ यांनी संगमनेरमध्ये सुरू असणाऱ्या गोहत्येकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले.