राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी अशी शंका ग्रामस्थांना व्यक्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेतला परंतू या महिले बाबत कोणताही सुगावा लागला नाही.राहुरी पोलिस या महिलेचा अन्यत्र शोध घेत आहेत.या घटनेमुळे परिसरात चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.
राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील महिला बारागाव नांदूर आणि डिग्रसच्या शिवारात शेतात चारा आणायला गेली होती. ती नेहमीप्रमाणे कामाला गेली, पण संध्याकाळ झाली तरी घरी परतली नाही. काळजी वाटून नातेवाईकांनी तिचा शेतात शोध सुरू केला. परिसरातील २५० ते ३०० एकर शेतात या महिलेस वन विभागाचे कर्मचारी व गावातील ७०० ते ८०० तरुणांनी रात्री १० वाजे पर्यंत शोध घेतला. परंतू या महिलेचा तपास लागला नाही. बिबट्याने या महिलेस ओढून नेले असेल तर शरीराचे काही अवषेश सापडणे गरजेचे होते. परंतू असे अवशेष कुठेच दिसले नाही. शेतात गेल्यावर चारा आणण्यासाठी नेलेले कापड सापडलं आहे. हे कापड पाहून त्यांचा संशय बळावला की कदाचित तिला बिबट्याने शेताजवळच्या उसाच्या मळ्यात ओढून नेलं असावं. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लगेच वन विभागाला कळवलं.

वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. वनपाल युवराज पाचरणे, वनक्षेत्रपाल राजू रायकर आणि कर्मचारी गोरक्षनाथ मोरे, ताराचंद गायकवाड यांच्यासह ७०० ते ८०० तरुण शोधकार्यात सामील झाले.
शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्राची पोत एका ठिकाणी सापडली. त्या दिशेने शोध घेतला. परंतू त्या महिलेचा काहीच पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ती महिला सापडली नाही.
वनपाल युवराज पाचरणे म्हणाले की, ही महिला अजून बेपत्ता आहे आणि तिचा शोध सुरू आहे. जोपर्यंत ती सापडत नाही, तोपर्यंत नक्की काय झालं हे सांगणं कठीण आहे. ग्रामस्थांना वाटतंय की त्या महिलेस बिबट्याने नेलं असावे पण याबाबत ठोस पुरावा अजून हाती आलेला नाही. तरीही सगळे जण शोधासाठी प्रयत्न करत आहेत. ही घटना घडल्यापासून परिसरात भीतीचं सावट आहे.
चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा सर्वत्र शोध घेवून तपास न लागल्याने राहुरीचे पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत. या महिलेजवळील मोबाईल शेतात जाई पर्यंत चालू होता. त्यानंतर महिलेचा मोबाईल बंद असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन समजले आहे. या महिले बाबत पोलिस सर्व शक्यता पडताळून शोध घेत आहेत.