अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे. अहमदनगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे.
कोणतीही पूर्व कल्पना न देता हे भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांचा संताप आहे. या संतापाला केडगावमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी वाट मोकळी केली.
महावितरणचे केडगाव येथील कार्यालयात त्यांनी आक्रमक होत तोडफोड केली. वातावरणातील उकाडा वाढलेला आहे. अहमदनगर शहराचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
रात्रीचा उष्मा वाढलेला आहे. त्यातच रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. ज्येष्ठ व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होतो.
अहमदनगर शहरात महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अघोषित रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातोय. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र उष्णतेच्या त्रासामुळे जागे राहून काढावी लागते.
खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर तो देखील होत नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधींना संपर्क साधून माहिती दिली.
त्यावर लोकप्रतिनिधींनी देखील महावितरण कार्यालयाशी संपर्क केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. नगरसेवक मनोज कोतकर यांच्याबाबत देखील तेच झाले.
त्यातून ते आक्रमक झाले. यावर कोतकर यांनी थेट केडगाव येथील महावितरण कार्यालय गाठले. महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाही.
तसेच लोकप्रतिनिधींना जनतेच्या त्रासाला सामोरे जावे लागते . त्यामुळे त्रस्त झाल्याने कोतकर यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारत कार्यालयाची तोडफोड केली.