Ahmednagar Breaking : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली असून त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे व आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत दोघे तरुण बुडाले होते. त्यांना शोधण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून नदीमध्ये उतरलेले होते.

शोधकार्य सुरु असतानाच एसडीआरएफ पथकाची बोट उलटून दुर्दवी घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांचा शोध घेणे सुरु आहे.
काय घडली होती घटना ?
अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले होते. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी घडली होती. सागर पोपट जेडगुले, अर्जुन बबन जेडगुले हे दोघे बुडाले होते.
सागर पोपट जेडगुले व अर्जुन बबन जेडगुले याच्यासह १० ते ११ जण बुधवारी मनोहरपूर फाटा परिसरात मूरघास काढण्यासाठी गेले होते. दुपारी १.३० ते २ दरम्यान मूरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी हे सर्व जण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटीवेअर बंधाऱ्याजवळ गेले होते.
यावेळी पोहताना अर्जुन जेडगुले हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्यास वाचवण्यासाठी सागर जेडगुले पुढे गेला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात सागरही पाण्यात बुडाल्याने दोघेही गतप्राण झाले.