Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. सीएनजी पाईप तसेच मोबाईल कंपनीच्या केबलसाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मातीचा ढिगारा तिघा मजुरांच्या अंगावर कोसळला. यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना राहुरी शहरा जवळ नगर-मनमाड रस्त्याच्या लगत घडली आहे. नगर-मनमाड रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे वेळोवेळी खोदकाम होत असल्याने पूर्वीच खड्डेमय झालेला नगर-मनमाड रस्त्याची चाळण झाली आहे.

त्यातच राहुरी शहराजवळ असलेल्या नगर- मनमाड महामार्गावरील एका ट्रॅक्टर शोरूम समोर खोदकाम सुरू असताना ४ ऑगस्ट रोजी सीएनजी पाईपलाईन जोडणीसाठी असलेल्या खड्ड्यात मोबाईल वायरिंग जोडणी करीत असतानाच मातीचा ढिगारा तिघांच्या अंगावर कोसळला.
यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील प्रदीप इंद्रभान भोसले (वय २७) हा जागीच ठार झाल्याचे समजले. तर आकाश सुरज देवरे, रा. खडका फाटा व चिंचाळे येथील दत्तात्रय जालिंदर चितळकर या दोघांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी माहिती मिळताच आ. प्राजक्त तनपुरे यांनी घटनेची सविस्तर माहिती घेत जखमींची भेट घेतली. पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करावी. मयत व जखमींना याप्रकरणी न्याय मिळावा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
या घटनेत युवकाचा बळी गेल्याची घटना दुर्दैवी असल्याचे मत आ. तनपुरे यांनी व्यक्त केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. गिते यांनी घटनास्थळी पथकासह हजेरी देत पंचनामा केला.
मृतदेह अहवाल आल्यानंतर याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.