Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्राकडे पावसाची पाठ ; धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा !

Pragati
Published:

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. उत्तर नगर जिल्ह्याच्या विविध भागामध्येही गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. यामुळे धरणाच्या पाण्यासाठी काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास  पावसाला सुरुवात झाली. रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अद्यापही म्हणावा तसा मान्सून दाखल झाला नाही. त्यामुळे भंडारदरा धरणात अद्याप नवीन पाण्याची फारसी अवाक झाली नसल्याने पाणीसाठा स्थिर असून धरणामध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अति महत्त्वाचे धरण समजले जाते. याच धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. यावर्षी जायकवाडी धरणासाठी भंडारदरा धरणातून पाणी झेपावले गेल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अगदी तळाला गेला आहे.

आताच्या परिस्थितीमध्ये भंडारदरा धरणामध्ये फक्त ११११ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस दाखल झाल्याने नवीन पाण्याची आवक होण्यास अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

भंडारदरा धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील उडदावणे, पांजरे या गावांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागले. जर पावसाने विलंब केला तर भंडारदरा धरणातून आणखी पाणी धरणाच्या लाभक्षेत्रासाठी सोडले जाऊ शकते.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये घाटघर व रतनवाडी येथे मंगळवारी दुपारी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून भंडारदरा धरणाच्याशाखेकडून पाऊस किती पडला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

मात्र सतत तीन तास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ११११ दलघफु होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe