Ahmednagar news : जनावरांना लागणारा चार आणण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील वडळी येथे घडली.सार्थक पांडुरंग वागस्कर (वय १४) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील वडळी येथील ८ वीमध्ये शिकणारा सार्थक पांडुरंग वागस्कर हा संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जनावरांना लागणारा हिरवा चारा (गिन्नी गवत) आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला होता. तो गवत घेऊन परत येताना वडळी श्रीगोंदा रस्त्यावरील – तळ्याच्या भरावाखाली असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये पलटी झाला.

या अपघातात सार्थक याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समजताच मुलाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात नेत असताना दुर्दैवाने सार्थक पांडुरंग वागस्कर याचा उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.