वीज वितरणच्या आडमुठे धोरणाचा शेतकर्‍यांना बसतोय फटका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- परतीच्या पावसाचा आधार मिळाल्याने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील काही भागात रब्बीची पिके येण्याची शक्यता आहे.

मात्र तत्पूर्वीच एक समस्यां समोर येऊन उभी ठाकली आहे. पिंपरी निर्मळ परिसरात शेती वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसा वीज पुरवठ्याच्या आठ तासांत तासभरही वीज येत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

पिंपरी निर्मळ फिडरवर टाकलेल्या शेजारच्या गावांचा अतिरीक्त भार वाढल्यामुळे वीज वितरणाच्या अडचणी येत आहेत. या फिडरवर इतर गावांचा शेती कनेक्शनचा बोजा वितरणने टाकला आहे.

यामध्ये बाभळेश्वर येथील कोकाटे मळा, राजुरी येथील मुसमाडे वस्ती, लोणी खुर्द येथील मापरवाडी व गाडगे मळा यांचा समावेश आहे.

त्यामुळे या फिडरची लांबी 35 किमीपेक्षा जास्त झाली आहे. या वाढलेल्या अतिरिक्त लोडमुळे गावाला केला जाणार्‍या शेती वीज पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत.

दिवसभरातील आठ तासांच्या वीज पुरवठ्यात तासभरही वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

वीज वितरणने हा वाढविलेला अवांतर लोड कमी करावा व गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News