संगमनेरमधील म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईवरून राजकारण तापले:

Published on -

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे.

कलंत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी तात्काळ पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तसेच, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन पुलासाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजुरीही दिली होती.

मात्र, स्थानिक भाजपा व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे श्रेय घेण्याच्या नादात या पुलाचे राजकारण सुरू केले. त्यांचे हे कृत्य स्थानिकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने असल्याचा दावा कलंत्री यांनी केला आहे.

शैलेश कलंत्री यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील प्रशासन आणि निधी वाटपावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण आहे. तरीही त्यांनी या कामासाठी कोणताही नवीन निधी दिला नाही. उलट, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेल्या शॉपिंग सेंटरचे काम अर्धवट बंद करून तो निधी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी वळवला. नवीन निधी मिळवण्याऐवजी सुरू असलेले काम थांबवून निधी वळवण्याचा अट्टाहास केल्यामुळेच मागील दोन वर्षापासून हे काम बंद असल्याचा आरोप कलंत्री यांनी केला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी नवीन पुलाच्या उभारणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला आहे. तसेच, स्थानिक नागरिकांनीही वेळोवेळी आंदोलने केली आहेत.

राज्यात महायुतीची सत्ता असतानाही साईनगरसाठी संरक्षक भिंत आणि म्हाळुंगी नदीवरील छोटा पूल यासारख्या मूलभूत अपेक्षाही ते पूर्ण करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. इतका छोटा निधीही त्यांना मिळू शकला नाही, असे कलंत्री म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील विकासकामे अडवून नागरिकांना त्रास देण्याचा उद्देश ठेवून काम करत असल्याचा आरोप कलंत्री यांनी केला. पंपिंग स्टेशन, साईनगर, घोडेकर मळा या परिसरातील नागरिकांची गैरसोय करत, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केवळ श्रेयवादासाठी हे काम जाणीवपूर्वक रखडवले असल्याचा दावा त्यांनी केला. या कामाच्या निघालेल्या वर्क ऑर्डरलाही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे ‘स्टे’ मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, असेही त्यांनी नमूद केले. म्हाळुंगी पुलाचे रखडलेले काम, नागरिकांची झालेली गैरसोय आणि विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड या सर्व बाबींसाठी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी जबाबदार असल्याची टीका कलंत्री यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News