जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ! ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Published on -

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता गती घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुधारणा व विकासकामांना गती मिळेल.

शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच भूमिगत गटार व पाणीपुरवठा पाइपलाइन यांसाठी बुधवारी जामखेड तहसील कार्यालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार गणेश माळी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी शेळके, लोभाजी घटमळ, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तहसीलदार गणेश माळी यांनी यावेळी स्पष्ट केले की, ठेकेदारांना पूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे आता कठोर कारवाई होणार आहे. बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल रस्त्याचे काम सुरू झाले असून, विंचरणा नदीच्या पुलावरील एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. सौताडा घाटातील 1200 मीटरचा रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत आहे.

शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतची पक्की अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २५ मार्च रोजी भूमिअभिलेख, नगरपरिषद, बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत ही अतिक्रमणे हटवली जातील. मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, रितसर मोजणी करून अतिक्रमण हटवले जाईल आणि लगेचच भुयारी गटार तसेच पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले जाईल.

जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे अनेक अपघात झाले असून, काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले की, पोलिस व महसूल विभागाच्या वतीने चौकशी सुरू आहे आणि दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe