AMC News आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागात शीघ्र प्रतिसाद वाहन दाखल

Published on -

अहिल्यानगर – शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन नागरिकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल, असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. सरकारने त्याची दखल घेत उपाययोजना सुरू केल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी शासनाच्या माध्यमातून नवीन शीघ्र प्रतिसाद वाहन (Quick Response Vehicle – QRV) उपलब्ध करून देण्यात आले. या विशेष वाहनामुळे आगीच्या घटना, आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनास जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे उपस्थित होते.

आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन २० फूट लांबीचे असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० लिटर पाण्याची व ३० लिटर फोमची क्षमता आहे. इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहराचा विस्तार वाढत असल्याने अग्निशमन सेवा बळकट करण्याची गरज आहे. राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधल्यावर एक वाहन तात्काळ उपलब्ध झाले आहे. अग्निशमन दलात गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी व अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातूनही अग्निशमन विभागासाठी उपाययोजनांना निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

अहिल्यानगर शहरामध्ये अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आणि दाट वस्ती असल्याने मोठ्या अग्निशमन वाहनांना पोहोचण्यास अडथळा येतो. यामुळे, आगीसारख्या दुर्घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवणे कठीण होते. हे नवीन शीघ्र प्रतिसाद वाहन लहान आकाराचे असून, अरुंद रस्त्यांमध्ये सहज प्रवेश करू शकते. त्यामुळे, लहान-मोठ्या आगीच्या घटनांवर त्वरित उपाययोजना करता येईल. तसेच, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe