Ahmednagar Rain : मोठा पाऊस होत नसल्याने चिंतेचे वातावरण

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाला नसताना ही पेरणीचा मोसम वाया जाऊ नये. म्हणून शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी केलेल्या खरीप पिकास मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. मात्र सलाईन प्रमाणे झालेल्या थोड्या-थोड्या पावसाने पिके बऱ्यापैकी उगवून येऊन ताशी लागली आहेत.

त्यामुळे पिकातील अंतर्गत मशागती शेतकरी बांधवांनी सुरू केल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाजळगावसह इतरही गावात जमिनीचे मोठे क्षेत्र असून, या क्षेत्रात शेतकऱ्यांनी नगदी पीक व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाकडे मोठा कल दिला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात व संपूर्ण तालुक्यातच कपाशी पिकाचा भरमसाठ पेरा व लागवड झाली असल्याने आता पेरणी केलेल्या पिकाचे रक्षण करून, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुढे येताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातून प्रत्येक वर्षी कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. या पिकासाठी लागणारी खते व औषधे वेळेवर मिळत नसल्याने व हा अनुभव प्रत्येक वर्षी येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोला महागाची खते व औषधे खरेदी करून ठेवले आहेत.

सध्या परिसरात व तालुक्यात मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र साधारण पडत असलेल्या पावसावरच पिके वाढताना दिसून येत आहेत. तालुक्यात अजून पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी बहुतेक ठिकाणच्या विहिरी व तळ्यांतील पाणी आटत असल्याने येणाऱ्या मोठ्या पावसाकडे मात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पावसाचे २ महिने उलटत असताना सुद्धा मोठा पाऊस होत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe