लग्नाळू तरुणांनो वेळीच सावध व्हा …! अन्यथा तुमचीही होऊ शकते फसवणूक

Pragati
Published:

Ahmednagar News : मुलांचे कमी शिक्षण, चांगली नोकरी नसणे, घर नसल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यामुळे पैसे गेले तरी हरकत नाही, पण मुलगी मिळाली पाहिजे, या भावनेतून काहीजण एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. अनाथाश्रम, गरीब घरच्या मुली असल्याचे सांगत सोशल मीडियावर जाहिरात करून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

सध्या शहरासह ग्रामीण भागात अनेक तरुण लग्न होत नसल्याने तणावात आहेत. त्यामुळे अशा तरुणांना गळाला लावून मोठी रक्कम घेतात मात्र लग्नानंतर काही दिवसातच नवरी घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे अशा तरुणांची पैसे देऊन फसवणूक झाल्यामुळे समाजात बदनामी होण्याच्या भीतीने याबाबत बहुतेकजण पुढे येत नाहीत. त्यामुळॆ या लोकांचे धाडस वाढले असून यात अनेक तरुणांचे आयुष्य वाया जात आहे.

विविध कारणांमुळे शहरासह विविध गावांतील लग्न होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. तसेच अशा मुलांचा शोध घेत त्यांना चांगली मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवणारे एजंट मोठ्या संख्येने सक्रिय झाले आहेत.

लग्न झाल्यानंतर तरुणी तुमच्यावर पोलीस केस करेल, आत्महत्या करेन, अशा धमक्या देत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक भीतीपोटी पोलिसांत तक्रार करीत नाहीत. अनेक भागात नुसते एजंट नाही तर सबएजंट देखील असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागांसह शहरालगतच्या परिसरात फसवणुकीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश कुटुंबे शेतकरी, कामगार आणि अल्पशिक्षित आहेत. कोणतीही चौकशी न करता मुलासाठी मुलगी मिळतेय, म्हणून लग्न उरकून टाकतात. शिवाय तक्रार आल्यानंतर पोलीस गांभीर्याने तपास करीत नसल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लग्न लावून देणारे एजंट १ लाख ते ३ लाख रुपये घेतात.

नुकताच श्रीगोंदा तालुक्यात लग्नानंतर नोटरी करण्यासाठी कोर्टातुन मुलाच्या आईच्या डोळ्यात मिरची पावडवर टाकून नवरीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान त्या मुलीने आतापर्यंत अनेकांना असाच गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe