Ahmednagar News:पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन घराबाहेर काढल्याची घटना घडली.
या प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरा, सासु, दिर, जाव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, डिसेंबर २०१९ रोजी पीडितेचे लग्न झाले होते.
लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पती, सासु, सासरे, दिर, जाव, यांनी फिर्यादीला पुणे येथे नवीन घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये घेवुन ये, असे म्हणत होते. मात्र पीडित विवाहितेने पैसे न आणल्याने तिचा सासरचे सर्व लोक शाररिक व मानसिक त्रास देवू लागले.
दरम्यान पीडित महिला पती सोबत पुणे येथे भाडोत्री घरात राहत असताना तेथेही पती त्रास देत असे. पुण्यात नवीन घर घेण्याकरिता आईवडीलांकडुन १० लाख रूपये घेवुन येण्याकरिता नेहमी शिवीगाळ करून मारहाण करत असे.
मार्च २०२२ रोजी पतीने पीडितेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देवुन राहत्या घरातुन हाकलुन दिले. त्यानंतर पीडित विवाहिता माहेरी राहत होती. नंतर ३ सप्टेंबर, २०२२ रोजी भरोसा सेल येथे सासरच्या लोकांच्या विरूध्द तक्रार दिली. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलने दिलेल्या पत्रानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.