अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रुंशी सामना करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी अनेक लढाया गनिमि काव्याचा वापर केला.
हे तंत्र वापरण्यासाठी आणि तातडीने निर्णय घेणारा प्रतिभावंत, धाडसी असा निर्णय फक्त छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शकतात, असे प्रतिपादन शिवभक्त मावळा रमेश वामन यांनी केले. वसंत टेकडी येथे डॉ.ना.ज.पाउलबुधे विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी अतिथी अंकुश साप्ते, किसन भोसले, प्राचार्य भरत बिडवे, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. श्री.वामन म्हणाले, गनिमि कावा हे एक प्राचिन युद्धतंत्र आहे.
मात्र हे तंत्र आपल्या अहमदनगर शहराजवळ असलेल्या भातोडी मध्ये निजामशाहीचे वझीर मलिक अंबरने मोगल आणि आदिलशाही यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रथम वापरले होते.
आपल्यापेक्षा ताकदवान शत्रुला जेरीस आणण्यासाठी गुप्तपणे शत्रुंवर हल्ले करण्याचे तंत्र म्हणजे गनिमि कावाचा वापर होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. श्री.अंकुश साप्ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे. महाराजांचे न थकता परिश्रम करणे, इतरांना प्रेरणा देणारे होते.
ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजतच होती. त्याचे अनुकरण करणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रास्तविकात प्राचार्य भरत बिडवे यांनी रमेश वामन हे खरे मावळे असून, त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त गड-किल्ल्यांना भेट दिल्या.
तेथील किल्ल्यांचा अभ्यास केला. श्री.अंकुश साप्ते यांनी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा भेट देऊन इतिहास स्मरणात राहील, असे विचार मांडले. या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. सूत्रसंचालन अर्चना कराळे यांनी केले तर आभार राजेंद्र मोरे यांनी मानले.