अहील्यानगर दि. १५ प्रतिनिधी जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा’ शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झाले. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकमंत्री महोदयांनी सक्रिय सहभागी घेऊन कामे करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन मंत्रालयातील मंत्रीमंडळ सभागृहात झाला. त्यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या पोस्टरचे अनावरण झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढविण्यात यावी. राज्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.