Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने सुरू असलेले उपोषण माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मध्यस्थीने दि. २१ नोव्हेंबर रोजी स्थगित करण्यात आले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी चौंडीमध्ये दि. १७ नोव्हेंबरपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते.

गेल्या पाच दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, महासचिव नितीन धायगुडे, उपोषणकर्ते सुरेश बंडगर, बाळा गायके, स्वप्निल मेमाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, यांच्यासह कार्यकर्ते चौंडीत उपोषण करत होते.
आ. शिंदे यांनी मंगळवारी सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देत येत्या तीन महिन्यांत समितीचा अहवाल येईल. या अहवालाच्या आधारावर सरकार धनगर समाजाच्या मागणीबाबत निर्णय घेईल, असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतर धनगर समाजबांधवांनी उपोषण स्थगित केले.
शासनाच्या वतीने बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा, या तीन राज्यांचा अभ्यास करून धनगर समाजाची मागणी कशी पूर्ण करता येईल, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यशवंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्य समिती गठीत करण्यात आली होती.
मात्र, शासन निर्णयामध्ये समिती किती दिवसात आपला अहवाल सादर करेल, याचा उल्लेख नसल्याने सोमवारी सरकारच्या वतीने आ. शिंदे यांनी केलेले बोलणी निष्फळ ठरली होती.
त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा आ. शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी येत्या तीन महिन्यांत समिती आपला तीन राज्यांनी त्या-त्या राज्यात धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल सादर करेल. त्यावर शासन तातडीने निर्णय घेईल, असे आश्वासित केल्यानंतर
यशवंत सेनेने आपले उपोषण आंदोलन मागे घेतले. आता आ. शिंदेंच्या शिष्टाईला यश आले असले तरी आश्वासन पूर्ण करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी कर्जत व जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते.