डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात साजरा

Published on -

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहमदनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) वर्धापन दिन 24 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगत, सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्र बांधणीसाठी आपले संकल्प पक्के करण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी विभागाचा इतिहास व विविध योजना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्यांनी यापूर्वीच्या मौजे मांजरसुंबा, टाकळी काझी, हिंगणगाव आणि डोंगरगण या गावांमध्ये आयोजित शिबिरांमध्ये झालेल्या उपक्रमांची माहिती दिली, ज्यात रक्तदान, स्वच्छता मोहीम, जल व मृदासंवर्धन, आणि डिजिटल साक्षरता यांचा समावेश होता.

महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. हरिभाऊ शिरसाठ यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. प्रा. सौ. जयश्री राऊत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. त्यांनी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामोद्धाराचे विचार मांडले आणि सहजीवन, सहशिक्षण, व सहभोजनातून सर्वधर्मी समानता वाढवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमात NSS स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वयंसेवक प्रांजली नागरे व अनुष्का तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश कदम व रिशिता चांगन यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर सेवक, व NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News