Ahmednagar News : बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल, पोलीस संरक्षणात एसटी बसेस पुण्याकडे रवाना !

Published on -

Ahmednagar News : शनिवारपासूनच शहरासह जिल्ह्याची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे खूप हाल सहन करावे लागले. खासगी वाहनचालकांनी याचा गैरफायदा घेत प्रवाशांची चांगलीच लूट केली. नगर-पुणे प्रवासासाठी ४०० ते ५०० रुपये आकारण्यात आल्याने प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूदंड बसला.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसच्या फेल्या रद्द करण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळ प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने रविवारी (दि.३) काही बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० एसटी बसेस पोलीस संरक्षणात पुण्याकडे रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि वाहतूक निरीक्षक विठ्ठल खेंगारकर यांनी दिली.

अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी रविवारी सकाळपासून पाहण्यात आली. खासगी वाहनचालकांनी अव्वाच्या सव्वा दराची आकारणी करत प्रवाशांची लुट करण्यास सुरुवात केली.

ही बाब लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेत डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांच्याशी चर्चा करून दहा बसेस पुण्याकडे पोलीस संरक्षण देऊन सोडल्या आहेत.

माळीवाडा व पुणे बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दोन दिवसांपासून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. एस टी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने काही प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

खाजगी वाहन चालकांकडून जास्तीचे भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून कारवाई करीत आहेत.

दोन दिवसात जास्तीचे भाडे आकारणाऱ्या १६ खाजगी वाहन चालकांवर कारवाई करून ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, दीपक बोरुडे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत बोरुडे, सतीश धिवर, सोमनाथ मुरकुटे, ज्ञानेश्वर मोरे, संतोष जरे, रामदास थोरात, गुलाब शेख, श्रीकांत खताडे यांनी ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News