अहिल्यानगर : भारत व पाकिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी सकाळी साईबाबांचे दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावे यासाठी साकडे घातले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाच्या पार्श्वभुमीवर खा. लंके यांनी साईबाबांजवळ विशेष प्रार्थना केली. देशासाठी प्राणाची आहुती देणऱ्या शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले की, दोन्ही देशांमधील ही परिस्थती लवकरच सुधारेल. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळया झाडून त्यांचे बळी घेतले. त्याचा बदला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कर अथवा तेथील नागरिकांवर हल्ला केलेला नाही. असे असतानाही पाकिस्तानकडून कांगावा करण्यात येत आहे हे दुर्देव आहे.
निष्पाप पर्यटकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना लष्कराने चोख उत्तर देत आपली क्षमता सिध्द केली आहे. अवघ्या २३ मिनिटांमध्ये आपल्या लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले हीच भारतीय सैन्य दलाचे वेगळेपण असून त्याचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे सांगतानाच साईबाबांच्या कृपेने देशात शांतता नांदो आणि सर्व भारतीय नागरीक सुरक्षित राहोत अशी सदिच्छाही खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केली.
खा. लंके यांच्यासमवेत वडझिरे ग्रामपंचायतचे सदस्य अनिल गंधाक्ते, मावळेवाडीचे सरपंच कांतीलाल भोसले, इंजिनिअर सचिन गवारे, दादा दळवी यांच्यासह शिर्डी व परिसरातील खा. नीलेश लंके यांचे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.