१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्रद्धास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबा देवीच्या दोन किलोचा सोन्याचा मुखवटा प्राणप्रतिष्ठा व शतचंडी यज्ञ सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.मंगळवारी या महायज्ञाच्या शेवटच्या दिवशी सकाळी होमहवन , पूर्णाहुती , देवीची आरती झाल्यानंतर दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे , सोलापूर या जिल्ह्यांसह राशीन परिसरातील बारावाड्यातील लाखो भाविकांनी श्री जगदंबा देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी राशीन शहरातील सर्व रस्त्यावर मोठा जनसागर उसळला होता . महाप्रसादासाठी उभारण्यात आलेला भव्य मंडपात एकाच वेळेस दहा हजार भाविकांच्या जेवणाची , पिण्याच्या पाण्याची , प्रसादाची व्यवस्था श्री जगदंबा देवी सेवा संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-89.jpg)
यावेळी राशीनसह बारावाड्यातील श्री जगदंबा देवी सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी महाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा केली.दुपारी एक वाजता सेवा संस्थेच्या वतीने श्री जगदंबा देवी मंदिरावर हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पृष्टी करण्यात आली .या ऐतिहासिक क्षणाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला . सर्व धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर ग्रामजोशी संदीप सागडे , मनोज सागडे यांच्यासह शतचंडी महायज्ञ विधी करण्यासाठीसाठी पुणे येथून आलेले १० ब्रह्मवृंद तसेच श्री जगदंबा देवी दोन किलोग्रॅम सुवर्ण मुखवटा तयार करणारे अहिल्यानगरचे कारागीर मूर्तिकार यांचा सत्कार केला . मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या शतचंडी महायज्ञाची मंगळवारी चैतन्यमय वातावरणात सांगता झाली.