Ahmednagar News : नगर-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रामाणात वाहतूक वाढली आहे. रास्ता मोठा करण्यात आल्याने भरधाव वेगात वाहने चालविण्यात येत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
यात अनेकदा वाहनांवर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोर चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. हि घटना नगर-सोलापूर महामार्गावरील बाभळगाव खालसा शिवारात घडली. हरिभाऊ राजाराम गरड, सुशीला गरड असे या घटनेत मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गरड दाम्पत्य नगर-सोलापूर महामार्गाने मिरजगाववरून निमगाव डाकूकडे घरी जात होते. ते नगर-सोलापूर महामार्गावरील बाभळगाव खालसा येथे आले असता रात्री ९ वाजता पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने जोरदार दुचाकीला (क्रमांक एमएच २३-वपी २५२) धडक दिली.
त्यात दुचाकीवरील हरिभाऊ राजाराम गरड (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सुशीला गरड गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
याबाबत मिरजगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, वाहने भरधाव चालविण्यात येत असल्याने अपघात वाढले आहेत. वाहनांवर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.