जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. आता रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. शिक्षक बदली हा नेहमीच चर्चेचा व बऱ्याचदा वादाचा विषय. परंतु जेव्हापासून ऑनलाईन प्रणाली आली आहे तेव्हापासून सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी शिफारस कामात येत नाही.
यावर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून सुमारे 15 हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज आलेले होते. आता या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झाली असून बदली झालेल्या शिक्षकांना रात्री उशिरा बदलीचे आदेश मिळाले आहे. बदलीचे हे आदेश ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आले असून राज्यातील ‘झेडपी’च्या 4 हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या बदल्यांमध्ये स्व:जिल्हा मिळाल्याने शिक्षकांमध्ये आता समाधानाचे वातावरण असणार आहे.

बदलीचे आदेश मिळालेत पण… आनंद अजून दूर आहे..
बहुप्रतिक्षेत असणाऱ्या बदल्या राज्य सरकारने केल्या असल्या, बदलीचे आदेश काढले असले तरी त्यांना लगेच आहे त्या शाळा, ते ठिकाण लगेच सोडू शकणार नाहीयेत. या शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. सध्या हे शिक्षक ज्या शाळेवर कार्यरत आहेत त्या शाळांवरच शिक्षकांना हे शैक्षणिक वर्ष काम करावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर अर्थात जूनमध्ये नवीन ठिकाणी रुजू होता येईल. राज्यातील तब्बल पंधरा हजार शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले असून त्यापैकी चार हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे 11 हजार अद्यापही प्रतीक्षाच करावी लागेल.
सहा डिसेंबरपर्यंत होती मुदत
शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. ऑनलाइन पद्धतीने सर्व अर्ज घेण्यात आले. ३० जून २०२३ ला बदलीस पात्र असतील, त्या शिक्षकांनाच अर्ज करण्याची संधी दिली होती. तसेच बदलीपात्र असलेल्या शिक्षकांसाठी बिंदुनामावली प्रसिद्ध करण्याची आणि अवलोकन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात आली.
बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील बदलीसाठी ही प्रक्रिया राबवली. त्यासाठी शिक्षकांना संकेतस्थळावर लॉगीन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला होता. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या ७ एप्रिल २०२१ च्या निर्णयानुसार राबवण्यात आला.