Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

१५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा, अडचणी आल्यास संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.

नगर जिल्ह्यात कृषि निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षांची जबाबदारी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, मोहिम अधिकारी अमृत गांगडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व समिती स्थापना करण्यात आलेली आहे. तालुका कृषि अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हा स्तरावर एकच प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी १५ भरारीपथके नियुक्ती केली आहेत.

शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी. खरेदी पावतीवरील लॉट नंबर व बियाण्याच्या बंगवरील टॅग व लॉट नंबर पडताळून पहावे.

बियाणे बॅग फोडताना वरील बाजुचा टॅग बॅगेला तसाच राहावा, यासाठी खालच्या बाजूने फोडावी, बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार उद्भवल्यास तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करणे सोईचे होण्यासाठी बियाण्याची फोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी, किटकनाशके किंवा तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घावी.

अधिकृत विक्री केंद्रामधूनच खते खरेदी करावीत. फिरत्या वाहनामधून खतांची विक्री होत असल्यास तक्रार करावी. खतांचा ई पॉस साठा, प्रत्यक्षातील साठा तपासला जाईल. तरी निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या बोगस निविष्ठांची विक्री करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.