Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील वाळकी, केडगाव आणि चास या तीन मंडलांमधील सुमारे ४५ गावांना अतिवृष्टीने मोठा तडाखा बसला आहे. यामुळे जवळपास २८०० मेट्रिक टन कांद्याचे आणि २९ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली, घरांचे नुकसान झाले आणि रस्ते-बंधारे उद्ध्वस्त झाले.
या नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी अकोळनेर, खडकी, बाबुर्डी बंद, वाळकी आणि शिरढोण या बाधित गावांचा दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, नुकसानग्रस्त ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी
या दौऱ्यात आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, पोलिस अधिकारी प्रल्हाद गीते, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, अभिलाष घिगे, रेवणनाथ चोभे, सुधीर भापकर, हरिभाऊ कर्डिले, संजय गिरवले आणि इतर अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी मिळून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश
विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, नुकसान झालेल्या सर्व पिकांचे, मग ते कांदा असो वा फूलशेती, सरसकट पंचनामे करा. विशेषतः अकोळनेर गावात मोठ्या प्रमाणात फूलशेती आहे, तिथेही नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मग ते शेतात असो वा साठवलेले असो, त्याचेही पंचनामे करा. कांद्याचे उतारे पाहणे थांबवा आणि प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घ्या, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, ज्या ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, तिथे गाळमुक्त तलाव योजनेतून माती आणण्यासाठी अनुदान देण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मृग बहार धरला होता, पण अतिवृष्टीमुळे तो गळून पडला. परिणामी, यंदा वर्षभर फळबागा खाली राहणार असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या फळबागांचेही सरसकट पंचनामे करण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले. तसेच, ज्या ठिकाणी जनावरांचे चारा-पिके वाहून गेली, तिथे तातडीने चारा उपलब्ध करून द्या आणि वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे करा, असेही त्यांनी सांगितले.
अतिक्रमित बांधकामांवरही कठोर कारवाई
सोनेवाडी येथे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या अनधिकृत बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची तक्रार स्थानिकांनी विखे पाटील यांच्याकडे केली. यावर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. अशा अतिक्रमित बांधकामांना पाडा आणि ओढे-नद्यांचा प्रवाह मोकळा करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, अहिल्यानगर शहरातील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामांवरही कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
शेतकऱ्यांना दिलासा
विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की, गरज पडल्यास विशेष बाब म्हणून सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांनी बाधित शेतकऱ्यांना धान्य वाटप करण्याचे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. रस्ते आणि बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यासाठी यंत्रांचा वापर करा, असेही त्यांनी सांगितले. या सर्व सूचनांमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.