उसाच्या फडातील बिबटे शेतवस्तीसह रस्त्यावर ! बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून दुर्लक्ष

Published on -

शेतशिवारातील ऊस तुटून गेल्यामुळे उसाच्या फडातील बिबटे आता शिकारीच्या शोधात थेट शेतवस्त्यासह रस्त्यावर धाव घेत आहेत. त्यामुळे कामधंदा आटोपल्यावर पाळीव प्राण्यांना गोठ्यात तर माणसांना सायंकाळी ६ वाजताच घरात जाऊन बसण्याची वेळ आली असल्याची व्यथा नांदूर शिवारातील शेतकरी चांगदेव गोरे यांनी व्यक्त केली.

नांदूर, रांजणखोलसह खंडाळा परिसरात सध्या ऊस तोडणीच्या हंगामाला वेग आला आहे. ऊस तुटून गेल्यानंतर उसाच्या फडात दबा धरून बसलेले बिबटे सैरभैर होऊन शेतवस्त्यासह परिसरातील रस्त्यावर दिसून येतात.

दरवर्षी ऊस तोडणी सुरू झाली की, बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, मेंढ्यांसह पाळीव कुत्रे, लहान मुलांसह दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना वाढतात. त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी तरूण अमोल गोरे यांनी केली आहे.

नांदूर परिसरातील गोरे वस्तीसह घोरपडे वस्ती परिसरात मागील काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा संचार असून सध्या शिवारातील ऊस तोटून गेल्याने सायंकाळच्या सुमारास शेतवस्तीसह परिसरातील लहान- मोठ्या रस्त्यावर बिबट्यांचे दर्शन घडत आहे. सकाळी व सायंकाळी डेअरीवर दूध घेऊन जाताना दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे.

अनेकदा रस्त्याच्या कडेच्या उसाच्या शेतात बिबट्या दबा धरून बसतो आणि दुचाकी येताच मागून झेप घेऊन हल्ला करतो.तसेच सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतात बहरलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीज सोडली जाते.

मात्र परिसरातील बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे जीवघेणे झाले आहे. शेतकरी दिवसाची वीज असल्यावरच शेतात पाणी भरत आहेत. परिणामी गहू, हरभरा, मका, कांदा पिकांसह भाजीपाला पिकांना पाणी भरणे रखडले आहे.

नांदूर शिवारातील गोरे, घोरपडे वस्ती परिसरात प्राथमिक शाळा असून शाळेसह आवारात तारेचे कुंपण आहे. परंतू शाळेत ये-जा करताना
परिसरातील रस्त्याच्या कडेला उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतातून बिबट्या केव्हाही हल्ला करू शकतो, अशी भीती नेहमी शालेय विद्याथ्यांसह पालकांमध्ये आहे. परिसरातील नागरीकांना रोज सायंकाळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन घडते. परिणामी, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावण्यासाठी वनविभागाकडे अनेकदा मागणी केली. परंतू बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नांदूर परिसरातील शेतकरी गोविंद घोरपडे, अरविंद घोरपडे यांच्यासह डॉ. गुलाबराव गोरे यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!