Ahmednagar News : जालना जिल्ह्यातील सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांची दि. ६ ऑक्टोबर रोजी जामखेड येथे स्वागत सभा होणार असून, या सभेच्या नियोजनासाठी बुधवार, दि. ४ रोजी ऑक्टोबर रोजी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी मनोज जरांगे यांची तहसील कार्यालयासमोर स्वागत महासभा होणार असल्याची माहिती जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणावर घटनात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ४० दिवसांचा वेळ मागून घेऊन मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती सरकारने केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपोषण सोडले, त्यानंतर वैद्यकीय उपचार घेऊन ते महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहेत.
त्यानुसार दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महासभेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने ४० दिवसांत जर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलं नाही तर यापुढील रोड मॅप काय असेल, याची रणनीती जामखेड येथील ४ तारखेच्या नियोजन बैठकीत ठरणार आहे.
मराठा समाजाचा आरक्षण लढा आता योग्य मार्गावर चालू असून, फक्त राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्णय होत नाही म्हणून या राजकीय इच्छाशक्तीला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी भाग पडणारी रणनीती ठरणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्रात ३५ टक्क्याच्या वर मराठा समाज असूनदेखील आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवल्याची भावना समाजात आहे. मात्र, आता योग्य नियोजन व रणनीती ठरवून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्याचा रोड मॅप जामखेड मराठा क्रांती मोर्चाने तयार केला असून,
तो महाराष्ट्रासाठी दिशा दर्शक असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महत्वाच्या नियोजन बैठकीस तालुक्यातील मराठा समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामजिक कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे