अहमदनगर ब्रेकिंग : दोन वेगवेगळ्या अपघातात तरुणासह विवाहितेचा मृत्यू

Published on -

दाढ बुद्रक ते कोल्हार रस्त्यावर मागील दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाने तर एका ३१ वर्षीय विवाहित महिलेने जीव गमावला आहे.

या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे एक अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने हे गतिरोधक मृत्यूचे यमदूत आहेत का?, असा प्रश्न या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना भेडसावत आहे.

संदीप भाऊसाहेब वाणी (वय ३२, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) हा तरुण जिओ केअर मध्ये नोकरी करत होता. सोमवारी (दि.१८) डिसेंबर रोजी दाढ बुद्रुक-कोल्हार रस्त्याने रात्रीच्या सुमारास घराच्या दिशेने तो दुचाकीवरून येत होता.

यावेळी दादा तांबे यांच्या वस्तीनजीक त्याला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने त्याचा भिषण अपघात झाला. यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेत काल बुधवारी (दि.२०) डिसेंबर रोजी स्वाती नितीन पाबळे (वय ३१, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या आपल्या पती समवेत दाढ बुद्रुक ते कोल्हार रस्त्याने सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून राजुरीच्या दिशेने चालल्या होत्या.

यावेळी खर्डे-पाटोळे वस्तीनजीक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील गतिरोधकावर दुचाकी आदळून अपघात झाला. यामध्ये स्वाती पाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासु, सासरे, असा मोठा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!