Ahmednagar News : उद्या मनोज जरांगेसह लाखो मराठे नगरमध्ये ! दीडशे एकरवर मुक्काम, १४ लाख फूड पॅकेट, १५ लाख पाणी बॉटल, ११० टँकर, फिरते रुग्णालय..अशी आहे व्यवस्था

Ahmednagar News

Ahmednagar News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलनासाठी मुंबईकडे पदयात्रेद्वारे आजपासून निघणार आहे. उद्या सायंकाळी ते नगरमध्ये येतील. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे रविवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची सभा होईल. यासही मोठी तयारी सुरु असून दीडशे एकर जमिनीवर हा मुक्काम असणार आहे.

दीडशे एकर जागेवर सध्या १० जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे सपाटीकरण केले जात आहे. दीडशे स्वयंसेवकही यासाठी परिश्रम घेत आहेत. पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत आहेत. मुक्कामी राहणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व्यवस्थित सोया व्हावी यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत.

जवळपास १४ लाख फूड पॅकेट व १५ लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत जरांगे पाटील यांची बारबाभळी येथे सभा देखिल होणार असून ते मार्गदर्शन करतील. याही व्यवस्था कशी असणार? यावर एक नजर आपण टाकुयात –

शहरातील डॉक्टरची टीम पुढे

पदयात्रेतील मराठा बांधवांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शहरातील डॉक्टर आता पुढे सरसावले आहेत. मेडिकल असोसिएशन देखी यात अग्रेसर असून औषधे पुरवणार आहे. २५ बेडचे फिरते रुग्णालय या मार्गावर चोवीस तास कार्यरत राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा

पदयात्रा मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरवर पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. नगर शहरातील जीपीओ चौक ते कायनेटिक चौक या मार्गावरील चंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांकडूनही मार्गाची पाहणी

मराठा समाजाची ही पदयात्रा अंतरवाली सराटी येथून मुंबईला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी पदयात्रेच्या मार्गाची पाहणी केली असून, हे पथक बुधवारी नगरमध्ये आले होते. त्यांनी पदयात्रेच्या मार्गासह मुक्कामाच्या जागेची पाहणी केली.

पाण्याची व जेवणाची व्यवस्था

जेवणाची व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५ लाख पाण्याच्या बाटल्या सभेच्या ठिकाणी जमा होणार आहेत.

तसेच पिण्याच्या पाण्याचे ११० टँकर तेथे असतील. जेवणही कुणाला कमी पडणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान एक लाख फूड पॅकेट तयार करून ते मुक्कामाच्या ठिकाणी आणले जाणार आहेत. म्हणजेच १४ तालुक्यातून १४ लाख फूड पॅकेज येतील.

स्वयंसेवकांमार्फत याचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय मक्कामाच्या ठिकाणी पुलाव व शिरा तयार केला जाणार आहे. सोमवारी सकाळी ही पदयात्रा नगर-पुणे रोडवरुन रांजणगावकडे मार्गस्थ होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe