अहिल्यानगर – महानगरपालिकेने मंगळवारी बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बुधवारी सुटी असल्याने गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. माणिक चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
बाजारपेठेसह संपूर्ण शहरात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचे नियोजन केले आहे. मंगळवारी दिवसभरात केलेल्या कारवाईत अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले. भिंगारवाला चौक ते तेलीखुंट चौक या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या २० पेक्षा जास्त विक्रेत्यांचे साहित्य, कपड्याचे गठ्ठे, जाहिरात फलक, दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. शहाजी रोडवरील सारडा गल्ली कॉर्नर ते पोखरणा ज्वेलर्सपर्यंत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ४० ते ५० हातगाड्यावर कारवाई सुरू होताच विक्रेते गाड्या घेऊन जिथे जागा मिळेल, तेथे पळाले. त्यातील अनेकांच्या गाड्या, साहित्य जप्त करण्यात आले.

तसेच, सारडा गल्ली ते मोहन ट्रंक डेपोपर्यंत रस्त्यावर १५ व्यवसायिक, दुकानदारांनी लोखंडी स्टूल, टेबल व जाळ्या टाकून अतिक्रमण केले होते. त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. मोची गल्ली, गंज बाजार व सराफ बाजारांमधील ५० पेक्षा जास्त हातगाडीधारक, पथविक्रेते यांचे साहित्य, टेबल, ताडपत्री, बांबू, जाहिरात फलक, गाड्या जप्त करण्यात आल्या. गुरुवारीही या भागात पथक गस्त घालत होते. त्यानंतर पथकाने माणिक चौक परिसरात मोर्चा वळवला. तेथे रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक, विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य, गाड्या जप्त केल्या. तसेच, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड करण्यात आला.
महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम थांबणार नसून, सर्व भागात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावर कोणीही एकच जागी थांबून किंवा रस्त्याला अडथळा होईल या पद्धतीने व्यवसाय करून अतिक्रमण करू नये, अन्यथा कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.