पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Published on -

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व ओढे व नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. बुधवारपासून शहरातील नालेसफाईला सुरुवात करण्यात येणार आहे. नाल्यातील गाळ, वाढलेली झुडपे काढून प्रवाह मोकळा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंगळवारी नालेसफाईचे काम सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केले. कोणत्याही परिस्थितीत नालेसफाई पावसाळ्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालय ते मिस्किन मळा रोड ते दामोदर बिर्याणी हाऊस, हॉटेल सनी पॅलेस ते अर्जुन वॉशिंग सेंटर, नगर मनमाड रोड, सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाउंडलगत ते मनमाड रोड ते सारडा कॉलेज ते महावीरनगर या भागासह सर्व भागातील नालेसफाई पावसाळा संपण्यापूर्वी पूर्ण करावी. नाल्यातून काढण्यात आलेला गाळ, गवत आदी तेथेच न टाकता उचलून दुसरीकडे नेऊन टाकावे. त्यासाठी जागा निश्चित करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्याची कामे प्रस्तावित असलेल्या ठिकाणी अतिक्रमणे काढून घ्यावीत. कोठी रोडवरील इंदिरानगरकडे जाणाऱ्या बाजूस असलेले रस्त्यालगतचे स्वच्छतागृह पाडण्यात आले आहे. आता इंद्रप्रस्थ कार्यालय ते भोसले लॉन या रस्त्याचे काम सुरू करायचे आहे.

तेथील अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा दोन दिवसात महानगरपालिका ही अतिक्रमणे कारवाई करून काढणार आहे. त्यानंतर काटवन खंडोबा रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. वारंवार नोटीस आणि समज देऊनही अतिक्रमणे न काढल्याने महानगरपालिका कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News