….अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल – शालिनी विखे पाटील

Ahmednagar News : सीताराम सारडा विद्याल्याचे मुख्याधापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माझ्याबरोबर चांगले काम केले आहे. शासनाचा जीआर असतानादेखील शाळेच्या परिसरामध्ये अवैध धंदे व गुटख्याच्या टपऱ्या दिसत आहेत.

कुलकर्णी यांनी यावर आवाज उठवल्यावर त्यांच्यावर हल्ला होत असेल तर समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, पोलिसांनी भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिला आहे.

सारडा विद्यालवाचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना काही गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. हेरंब कुलकर्णी यांनी सारडा विद्यालयाच्या परिसरातील गुटख्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढावे, अशा सूचना त्यांना दिल्या होत्या,

त्याचा राग मनात धरून अचानकपणे हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आ. संग्राम जगताप व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.

या वेळी सौ. विखे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रोकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संवाद साधला. या वेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक चळवळीत राहून काम करणारे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात वळली आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच ठिकाणी जर अवैध धंदे, गुटकाविक्री होत असेल तर विद्यार्थी कसा घडला जाईल,

हा विचार मनात ठेवून हेरंब कुलकर्णी यांनी सारडा विद्यालय परिसरातील गुटख्याच्या टपऱ्या काढण्याची मागणी केली. त्याचा राग मनात धरून त्यांना वेदम मारहाण करण्यात आली, शिक्षण क्षेत्रावरील हा भ्याड हल्ला असून, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.