आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रिम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिल्या आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रिम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही.
त्यामुळे उर्वरित पिक विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम पिक विमा रक्कम मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ४५ हजार ६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण ६४ हजार २३ शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते.
विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी,
यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून पिक विमा कंपनीने प्राथमिक स्वरुपात सोयाबीन पिकाचे अग्रिम पिक विमा रक्कम वाटप केली असून यामध्ये सोयाबीन पिक विमा काही शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा रक्कम मिळालेली नाही.
यामध्ये एकूण ६४ हजार २३ पिक विमा धारक शेतकऱ्यांपैकी सोयाबीन १०,०००, मका ६,०००, बाजरी ७४०, कांदा ४३५, कपाशी ३,८८८ व तुर २१५, अशा एकूण २१,२७८ शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही.
मतदार संघातील कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होवून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पिक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.