अहिल्यानगरमध्ये दारू, गांजा अन् अंमली पदार्थ विकणाऱ्यांना पोलिसांचा दणका, १४ कोटींचा माल जप्त करत १४० नशेखोरांवर कारवाई

जिल्ह्यात नशेखोरी वाढत असताना पोलिसांनी विशेष मोहीम राबवून २० दिवसांत १४ कोटी ९ लाखांचा अमली पदार्थ जप्त केला. १८ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, नशा करणाऱ्यांवरही कठोर कारवाई सुरू आहे.

Published on -

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, यामुळे सामाजिक आणि कायदेशीर समस्या गंभीर बनल्या आहेत. दारू, गांजा आणि मेफेनटरमाईनसारख्या औषधी पदार्थांचा नशेसाठी वापर करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली १ मेपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. 

या मोहिमेंतर्गत पोलिसांनी २० दिवसांत ९ कारवायांमध्ये १४ कोटी ९ लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. विक्रेत्यांसह नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवायांमुळे अमली पदार्थांचे रॅकेट चव्हाट्यावर आले असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

श्रीरामपूरमध्ये १३ कोटी ७४ लाखांचा अंमली पदार्थ जप्त

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात अमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. टपरी, उद्याने, झुडपे, वाईन्सचा परिसर आणि भाजी बाजारासारख्या ठिकाणी नशेचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील मोकळ्या जागा आणि अंधाऱ्या ठिकाणी नशा करणाऱ्यांचा वावर असतो. काही ठिकाणी तर वर्षानुवर्षे हे अड्डे कायम असून, स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता या ठिकाणी कारवायांचा जोर वाढवला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः श्रीरामपूर येथे मोठी कारवाई करत १३ कोटी ७४ लाखांचा अमली पदार्थ जप्त केला, ज्यामुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

१४० नशेखोरांवर पोलिस कारवाई

या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी मे महिन्यात ९ ठिकाणी छापे टाकले, तर मागील चार महिन्यांत एकूण १८ कारवाया केल्या. या कारवायांमध्ये १४ कोटी ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये राहाता येथे २.६६ लाखांचा गांजा, श्रीरामपूर येथे १३ कोटी ८३ लाखांचा गांजा आणि अल्प्राझोलम, कोतवाली येथे ३३ हजारांचा मेफेनटरमाईन सल्फेट, पाथर्डी येथे १७ हजारांचा गांजा, भिंगार कॅम्प येथे २५ हजारांचा गांजा आणि शिर्डी येथे ३२ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. मागील चार महिन्यांत ७० लाखांचा गांजा जप्त झाला असून, १४० नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमुळे अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्यांना चाप बसला आहे.

भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवली जात आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, अमली पदार्थविरोधी कारवाया यापुढेही असेच सुरू राहतील. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना सूट न देता त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. नागरिकांनीही अमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!