भोंग्यावर टीका केल्याची शिक्षा ? अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकाराला घरासमोरच जबर मारहाण

Published on -

श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर परिसरात १९ मार्च २०२५ रोजी एका वरिष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेली टीका असल्याचे समोर आले आहे. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पत्रकार संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हल्ल्याची घटना १८ मार्च २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सलीमखान चांदखान पठाण (वय ६०, व्यवसाय पत्रकारिता), हे मिल्लतनगर, वार्ड नं. ०१ येथील रहिवासी आहेत. ते नमाज पठणासाठी मशिदीकडे जात असताना त्यांच्या घरासमोरच आरोपींनी त्यांना अडवले. प्राथमिक तपासातून असे निष्पन्न झाले आहे की, १५ मार्च रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पठाण यांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासावर टीका केली होती. याच बैठकीत त्यांनी काही आरोपींवर माध्यमांतूनही टीकास्त्र सोडले होते. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हा हल्ला घडवून आणला.

हल्ल्यादरम्यान आरोपी जोएब युनुस जमादार याने पठाण यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पठाण गंभीर जखमी झाले. याचवेळी झिशान गनी शेख याने त्यांच्या पेंटच्या खिशातून २७,००० रुपये (५००च्या ५४ नोटा) हिसकावले, तर जोएब जमादार याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन खेचून घेतली. हल्ल्यानंतर पठाण यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत जोएब युनुस जमादार, हुजेब युनुस जमादार, ओसामा युनुस जमादार, झिशान गनी शेख, राजीक शेख, झिशान सय्यद, लुकमान शहा, शाहीद मुख्तार शेख आणि इतर सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्रमांक ०३१७/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ११८ (१) (२), ११९ (१) (२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१ (२) आणि क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सहाय्यक निरीक्षक ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई होत आहे.

या घटनेने पत्रकारांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार संघाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी पत्रकारांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले, ज्याची प्रत शहर पोलीस निरीक्षक नितिन देशमुख यांनाही सादर करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News