Ahmednagar City News : शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडून कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नव्याने बांधावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा पुल अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होवून अपघात होत आहेत.
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Railway-flyover-should-be-demolished-and-constructed-anew.jpg)
त्यातच या पुलावरून एक डंपर जात असताना थेट या पुलाखाली पडून अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पुलाच्या आजूबाजूला प्रियांका कॉलनी परिसरात मोठी नागरी वसाहत असून त्यांना देखील या पुलापासून धोकाच आहे.
केडगाव येथील रेणुका मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्र उत्सवादरम्यान भाविक याच पुलावरून देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात, त्याचप्रमाणे नगर शहरात झालेला नविन उड्डाण पुल तसेच दौंड हायवे देखील कायनेटीक चौकात येतो,
त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक कायनेटीक चौकामध्ये उड्डाण पुलावरील आणि उड्डाण पुलाखालील वाहने एकाच वेळी एकत्र येवून येथे मोठी वाहतुक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागतात.
कायनेटीक चौक तसेच केडगाव परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. याकरिता सदरील रेल्वे उड्डाणपुल नविन बांधून त्याची लांबी कायनेटीक चौकाच्या पुढे नेणे आवश्यक असल्याचे कोतकर यांनी म्हटले आहे.